15/11/2018
दक्षिण काशीची आनंदवारी
हरिहरेश्वर मंदिर परिसर :
आपल्या देशात समुद्रकिनाऱ्यावर असलेली सगळीच देवळं बघताक्षणी मोहून टाकणारी, कुणाच्याही मनात भरणारी आहेत. देवावर विश्वास असो किंवा नसो, तिथे येणाऱ्या प्रत्येकाला या देवळांची रचना, तिथलं निसर्गसौंदर्य बघून भारावून जायला होतं. ही देवळं, इथला परिसर खऱ्या अर्थाने मानसिक शांतता देतात, भरपूर समाधान देतात. कोकणात अशी समुद्रकिनाऱ्यावर, डोंगराच्या कुशीत लपलेली अनेक मंदिरं आहेत. त्यापैकी बहुतांश शंकराची आहेत. हरिहरेश्वर हे अशाच वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांपैकी एक. ‘चला, भटकू या’च्या आजच्या भागात हरिहरेश्वर आणि लगतच्या पर्यटनस्थळांची सफर...........................
शंकराच्या प्रत्येक ठिकाणच्या देवस्थानांची नावं वेगवेगळी आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातलं डोंगराच्या कुशीत, एका गुहेमध्ये कोरलेलं मार्लेश्वर देवस्थान, राजापूरजवळचं धूतपापेश्वर मंदिर, संगमेश्वरजवळ नऊशे वर्षांपूर्वी कर्ण राजाने बांधलेलं कर्णेश्वर मंदिर, सिंधुदुर्गातलं कुणकेश्वर मंदिर, ही त्यातली काही प्रमुख मंदिरं. रामेश्वर, पाटेश्वर, आत्मेश्वर, विमलेश्वर, कलेश्वर, अशा नावांनीही शंकराची देवस्थानं प्रसिद्ध आहेत. रायगड जिल्ह्यातलं हरिहरेश्वर हे मात्र त्यातलं वेगळं आणि वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण.
एकूणच महाराष्ट्राला कोकणाचं आणि कोकणाला समुद्रकिनाऱ्याचं वरदान लाभलं आहे. कोकणातले अनेक किनारे तर अगदी तुरळक वावर असलेले, शांत आणि लांबच्या लांब आहेत. हरिहरेश्वरचा किनारा आता जास्त लोकप्रिय झालेला असला, तरी एकेकाळी तो अगदीच शांत आणि फारसा माहीत नसलेला होता. त्या काळी समुद्रकाठावर वसलेलं हे मंदिर नक्कीच सौंदर्याची खाण वाटत असणार. आजही मंदिराचा दिमाख तोच असला, तरी किनाऱ्यावरची गर्दी नक्कीच वाढली आहे.
श्री क्षेत्र हरिहरेश्वरला दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं. हे देशातलं एक महत्त्वाचं तीर्थस्थान आहे. हरिहरेश्वर हे गाव ब्रह्मगिरी, विष्णुगिरी, शिवगिरी, पार्वती या चार टेकड्यांच्या कुशीत आहे. हरिहरेश्वराचं देऊळ शिवकालीन असावं असं सांगितलं जातं; पण बांधकामाचा निश्चित कालखंड सांगता येत नाही. पहिल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचं सांगितलं जातं. हरिहरेश्वर, कालभैरव योगेश्वरी, सिद्धिविनायक आणि हनुमान अशी चार देवळं इथे आहेत.देवळात दर्शन घेतल्यानंतर सुरू होतो या देवळाच्या प्रदक्षिणेचा भन्नाट प्रवास. पूर्ण डोंगराला वळसा घालून ही प्रदक्षिणा करावी लागते. त्यासाठी देवळाच्या मागून एक छोटीशी चढण चढून गेल्यानंतर आपण त्या कड्याच्या वरच्या भागात पोहोचतो आणि खाली नजर टाकल्यावर अथांग, निळाशार समुद्र नजरेस पडतो. इथून एक मोठी दगडी पायऱ्यांची घाटी उतरून जावं लागतं. तिथून समुद्राच्या काठाने असलेल्या कातळावरूनच प्रदक्षिणा पूर्ण करावी लागते. या संपूर्ण प्रदक्षिणेचे अंतर एक कोस असल्याने तिला कोसाची प्रदक्षिणा असे म्हणतात. समुद्रकिनाऱ्याच्या ओढीने हरिहरेश्वरला येणारे पर्यटक तर आहेतच, पण इथून दिसणारा समुद्राचा देखावा आणि खडकांवर आपटणाऱ्या लाटांचे तुषार अंगावर उडवून घेत ही प्रदक्षिणा पूर्ण करणं, समुद्राचा खडकांशी चालणारा पकडापकडीचा खेळ अनुभवणं हेच धमाल आहे. फक्त तेवढ्यासाठी हरिहरेश्वरच्या असंख्य वाऱ्या कराव्यात! समुद्राच्या लाटा सातत्याने आपटल्यामुळे या खडकांमध्ये तयार झालेले वेगवेगळे आकारही निव्वळ पाहत राहण्यासारखे.प्रदक्षिणेचं समाधान झालं, की आनंदाचा उरलेला कोटा पूर्ण करायला हरिहरेश्वरचा विस्तीर्ण समुद्रकिनारा आहेच! हवा तेवढा वेळ इथल्या पुळणीवर पहुडावं आणि समुद्राची गाज ऐकावी किंवा समुद्रात मनसोक्त डुंबावं. अगदीच हौस असेल, तर किनाऱ्याचा थांग काढण्यासाठी फेरफटका मारावा. हरिहरेश्वरमध्ये राहण्यासाठी अनेक हॉटेलं आहेत. ‘एमटीडीसी’चं टुमदार विश्रांतीगृहसुद्धा आहे.
हरिहरेश्वरला जाण्याआधीच श्रीवर्धन हे तालुक्याचं ठिकाण लागतं. इथेही समुद्रकिनारा पाहण्यासारखा आहे. पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांचं हे मूळ गाव. या ऐतिहासिक गावात अनेक प्राचीन मंदिरं आहेत. गावात कुसुमादेवी मंदिर हे ग्रामदेवतेचं मंदिर गावापासून लांब, डोंगरात, झाडांच्या हिरव्या छायेत वसलेलं आहे. त्याशिवाय लक्ष्मीनारायण मंदिर पाहण्यासारखं आहे. या देवळातील विष्णूची मूर्ती काळ्या पाषाणात कोरलेली, दक्षिण भारतीय शैलीची आहे. त्याशिवाय परिसरातील सोमजाई मंदिर, पेशवे मंदिर हीसुद्धा पाहण्यासारखी मंदिरं आहेत. पेशवे मंदिरात श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचा पेशवाई पगडी व वस्त्र परिधान केलेला पूर्णाकृती पुतळा आहे.दिवेआगरमध्ये सापडलेली सुवर्णगणेशाची मूर्ती
हरिहरेश्वरला जायचं, तर दिवेआगरची एक चक्कर व्हायलाच हवी. दिवेआगर हे ऐतिहासिक ठिकाण म्हणून, समुद्रकिनाऱ्याचं गाव म्हणून प्रसिद्ध असलं, तरी इथे जायचं ते नारळी-पोफळींच्या बागांचा गारवा अनुभवायला. गावात शिरल्यावरच ही बागांची हिरवाई लक्ष वेधून घेते. उन्हाचा कडाका शांत करते आणि गावपणाची सुखद झुळूक देते. नारळ आणि सुपारीची विक्री हाच इथल्या लोकांचा मुख्य व्यवसाय असल्यामुळे इथल्या बागा अजूनही संपन्न आहेत. इथेच द्रौपदी पाटील या महिलेच्या बागेत १९९७मध्ये जमीन खोदण्याचं काम सुरू असताना एका लोखंडी पेटीत गणपतीची सोन्याची मूर्ती सापडली. ही मूर्ती सुमारे एक हजार वर्षांपूर्वीची होती. बावन्नकशी सोन्याच्या, १.३२ किलो वजनाच्या या मूर्तीची एका देवळात स्थापना करण्यात आली होती. सुवर्णगणेश म्हणून या मूर्तीला प्रसिद्धी मिळाली होती. २०१२मध्ये ही मूर्ती चोरीला गेल्याची अप्रिय घटना घडली, तरी देऊळ आहे त्या जागी अजूनही आहे. या मूर्तीसोबत मराठीतील पहिला ताम्रपटही दिवेआगरमध्ये सापडला आहे.
दिवेआगरला ऐतिहासिक वारसा आहे. पूर्वी या गावाचं नाव दीपआगर असं होतं. यावर मौर्य, सातवाहन, राष्ट्रकूट, तसंच नंतर शिलाहारांनी राज्य केलं. इथलं ऐतिहासिक रूपनारायण मंदिर हे याच शिलाहारांनी बांधलं. या गावात एकूण पाच ताम्रपट आणि एक शिलालेख सापडला आहे. दिवेआगरमधील रूपनारायण, उत्तरेश्व र, पंचमुखी महादेव यांची मंदिरंही पाहण्याजोगी आहेत.
माडापोफळींच्या बागेतून समुद्राकडे जाणारा दिवेआगरमधला रस्ताही विलक्षण आहे. केवड्याच्या बनातून आधी समुद्राचं दर्शनच घडत नाही; मात्र एकदा ही बनं ओलांडून पुढे गेलं, की नजरेच्या टप्प्यात न बसणारा अफाट समुद्रकिनारा पाहून आश्चर्यचकित व्हायला होतं. इथून संध्याकाळी निवांतपणे सूर्यास्त बघण्याची मजासुद्धा वेगळीच. सूर्याचा लाल गोळा समुद्रात बुडताना पाहायला जी मजा येते, तिची तुलना कशाशीच नाही.
कोकणात जायचं, तर सोलकढी, मोदक, आमटीभात आणि विविध प्रकारचे मासे, या मेजवानीचा आनंद घ्यायलाच हवा. अस्सल घरगुती चवीचे मसाले वापरून तयार झालेले वेगवेगळे पदार्थ चाखत, समुद्राची गाज ऐकत इथे रमण्यासारखं दुसरं सुख नाही!
हरिहरेश्वरला जाण्यासाठी :
हे ठिकाण मुंबईपासून २१६ किलोमीटर, तर पुण्यापासून अंदाजे १७० किलोमीटर अंतरावर आहे. पुण्याहून जायचं, तर ताम्हिणी किंवा भोर-वरंधमार्गेही रस्ता आहे. ताम्हिणी घाटमार्गे हरिहरेश्वरला जायला चार ते पाच तास लागतात. मुंबईहून हरिहरेश्वरला जाण्यासाठी माणगावमार्गे जावं लागतं. मुंबई-गोवा महामार्गावरून कोलाडवरून गोरेगावमार्गे जाता येतं.